तात्या

आज्यो...बाssss', आज्योssबा’ कितीतरी वेळ आज्यो मधल्या ’ज्यो’ वर एक इनोसन्ट गिरकी घेत माझ्या अगदी समोर उभ्या असलेल्या माणसाच्या खांद्यावर त्याचं आजोबा पुराण चाललेलं. ठेक्यात चार पाच वेळा त्याच्याकडून आबोजा-बिबोजा असं कौतुक करुन घेतल्यावर आजोबानेही कपाळावरचा घाम पुसला. बराच वेळ त्याच्याकडे बघत बसल्यावर नंतर मलाही गरम व्हायला लागलं. ’काय पण जागा मिळालीये गुंफा बांधायला...’टेकडीवर चढून बांधायची ना..’ असा माझा मूक वैताग चाललेला.

गुंफा बांधायच्या, म्हणजे फक्त बांधून ठेवायच्या...डागडुजी करण्याच्या नावाने बोंब..पलीकडे ताटाएवढ्या भोकातून गळती सुरु, वावर नाही तिथे शेवाळं हौसेने वाढलेलं...नवरात्र, महाशिवरात्रीला हीssssss गर्दी. ’पुष्कळ जुन्या म्हणजे २००-३०० वर्ष जुन्या असतील नाही का’...कुणी म्हणायचा अवकाश लोकांचं पुढचं वाक्य असतं’ पांडवकालीन’ आहेत’..
?????????

२००-३०० वर्ष जुन्या पांडवकालीन कशा असतील.... बरं असल्याच तर पांडव इथे राहून गेले म्हणून प्लीज सांगू नका...जिथे जावं तिथे हेच ऐकावं पांडव अज्ञातवासात असताना इथे होते......अर्रे....याला काहीतरी प्रमाण? असं विचारायला जावं तर पुढचं उत्तर...’हो मग पांडव भारतभर फिरले होते..’

भारतभर फिरले होते म्हणून प्रत्येक बोगदा न बोगदा फिरले होते का......असा सात्त्विक संताप होउन विचारण्यात अर्थ नसतो. कारण या दंतकथा असतात. त्या माणसाला त्याच्या पणज्याने, मित्राने,आजीने कुणीतरी सांगितलेल्या असतात. कथेत राम आणि पांडव एकत्र नांदतात, वनवास, अज्ञातवासात फरक उरत नाही.
’सोड....मरु दे..तुला ऐतिहासिकता कळतंच नाही. पहिल्यापासून बायेझ्ड आहेस.’ सेल्फ टॉकमधून बाहेर पडण्यासाठी ते आजोबावालं पिल्लू दिसलं आणि थोडावेळ विसर पडला. लहान मुलं हा एकतर वीक पॉईन्ट त्यात ती रडत-बिडत नसतील तर दुधात साखर...

’आ नथी करवानु..’

आज्योबाssss म्हटल्यावर हा मराठी वाटला होता, हे काय मध्येच....म्हणजे माझ्या कल्पनेनुसार त्याचे वडील आणि बाजूला आजोबा अशी जोडगोळी आधी उभी होती. नंतर पूजेचं ताट वगैरे घेउन आई, आणि बहुतेक आजी वगैरे मंडळीही आली होती. पण मराठी आहेत याबाबतीत ठाम झाले होते. त्यात गोंधळ म्हणून आजोबा-आजी मराठीत, वडील हिंदी-गुजराती,..आई माहिती नाही अशी कोणतीही एक भाषा अशी देवाणघेवाण झाल्यावर कोडयात पडले. हे असं काय..........

कशाला हवेत वितर्क...असतील एकमेकांच कोणीतरी.

थोडया वेळाने आजोबा थकल्यावर बाजूला टाकलेल्या खुर्चीवर बसायला गेला.....पिल्लूचे डोळे भिरभिरुन त्याला शोधायला लागले. एवढा वेळ पांढरे केस विस्कटून, हातावर गिरक्या घेउन खेळवणारा आजोबा त्याला दिसेनासा झाला. इकडून तिकडून मान हलवून पाहिली....माझ्या आणि मागच्या रांगेतल्या लोकांकडे बघून झालं पण नाही....

बाबालाही आवरेनासं झालं... आणि गळ्यातून सूर निघण्याचा अवकाश आजोबा दिसला.....बाबाच्या खांद्यावरुन. हसूच हसू.........मग आजोबाला उठवून त्याच्याच खुर्चीत शेठासारखं टेकून बसला.

आजोबा दिसत नाही कळल्यावर मात्र त्याच्या पाच मिनिटासाठी कावर्‍याबावर्‍या झालेल्या अवस्थेत मीच अस्वस्थ झाले बरीच. खूप वर्षांनी ’आजोबा’ हा शब्द जगताना डोळ्यापुढे अनुभवला. आजी-आजोबांचं सुख कुणाला लाभतं, कुणाला अजिबात नाही. माझे आजोबाही खूप ग्रेट होते का?.........म्हटलं तर हो!

सगळ्यांचेच ग्रेट असतात, तरीही आपल्या आपल्यापुरते आपले तेच सगळ्या विश्वात ग्रेट असावेत.

इकडच्या आणि तिकडच्या दोन्ही घरी लहानपणी आजोबा-आजी दोघंही. एक नाना आणि दुसरे तात्या.

नानांशी कधीही जवळीक निर्माण झाली नाही....भितीमुळे?...असेल. बहुतेक त्यांची आजारपणामुळे सारखी चीडचीड होत होती म्हणूनही असेल. पण त्यांच्याशी सूत जुळलंच नाही.

तात्यांबरोबरचा मात्र माझ्या आयुष्यातला छोटासा आजोबा-नातीच्या विश्वातला तुकडा आजही जपून मी ठेवलाय. पण आठवणींचे काही बरेच तुकडे जिवाला सुकून देणार्‍यापैकी असावेत पण तात्यांच्या आठवणी प्रत्येक क्षणी केवळ अस्वस्थच करुन जातात.

भूतकाळात म्हणून रमून यावंसं वाटलं तरी माझ्या वर्तमानात माझा गॉडफादर माझ्या जवळ नाही ही जाणीवच मुळात खूप त्रासदायक ठरते. त्यांच्या आठवणीत रमणं जाणून, उमजून टाळण्याचा माझा प्रयत्न असतो. अर्धुकात असल्याची जाणीव चिमटा काढून कुणीतरी समोर दाखवावी तसंच काहीसं होतं.

तात्या म्हणजे पहाडासारखा मनाने मजबूत तरीही जिंदादील, खळाळत्या झर्‍यासारखा प्रवाही माणूस.
माझ्या स्मृतीतल्या तात्यांचा कधीही देवादिकांवर विश्वास नव्हता. पण सुट्टीत मी रहायला गेल्यावर, आजीला पूजेसाठी फुलं गोळा करायला मी आणि तात्या अशी जोडी पहाटे पहाटे बिल्डींगखालच्या बागेत निघायची. प्राजक्ताचं नवं झाड, तेव्हा त्याचा भरभरुन सडा पडायचा., लालचुटुक जास्वंद आणि तगरीची फुलं अशी नेहमी ठरलेली फुलं बास्केटमध्ये गोळा करण्याचं मला वेड होतं. हार करताना आधी दोर्‍याच्या शेवटच्या टोकाला एका हाताने गाठ कशी मारायची हे तात्यांनीच दाखवावं.

एकदा...बागेत प्राजक्ताच्या झाडाखाली फत्कल मारुन आजूबाजूची टप्पोरी फुलं वेचता वेचता वेचता ती संपली...म्हणजे लवकरच संपली...अर्धी परडी भरण्याच्या आत. आता हारासाठी उरलेली फुलं कुठून आणायची.. प्राजक्ताचा मोतिया पांढरा हार तर आजी बाळकृष्णालाच घाली.,तो कुठून पूर्ण करायचा अशा जगावेगळ्या शंकेने अस्मादिक जमिनीवरच बसून..उठायचं मनच होईना. आजूबाजूला फिरणार्‍या तात्यांचाही क्षणभर विसर पडला...

आणि अगदी थोड्याच वेळात फ्रॉकच्या खळग्यात चार-पाच ओलसर फुलं घरंगळली. चटकन नजर बाजूला
फिरायच्या आत....दोन तीन, चार.....बरीच फुलं जागोजाग...आणि समोर तात्या झाड गदागदा हलवत, मिश्कील हसत उभे होते.

या आठवणीची तीव्रता इतकी आहे की कुठल्याही पेचात अडकण्याची जाणीव व्हायचा अवकाश तात्या माझ्या जवळ नाहीत हे वाटून मन कळकळून उठतं.
मी आणि सावळी पण गोबर्‍या गालाची अपूर्वा आम्ही आणि तात्या आणि काळ्या-जांभळ्या रंगाची दोन रुपयाची पेप्सी....कधीही, कुठेही!
गृहपाठाच्या वह्या तात्यांकडे चेक करण्यासाठी म्हणून गेल्या की वहीवर १०००/१००० V.Good असा रिमार्क.......... :) निखळ आनंद देण्यात तात्यांचा वाटेकरी अजून जन्मला नाही.

एका पहाटे फोन खणाणून तात्यांना बरं नाही असा निरोप यावा...भोवताली सगळ्यांचे चेहरे गंभीर व्हावेत.
’त्यात काय एवढं?....बरा होईल तो आजारीच आहे ना!’

रिक्षातून थेट त्याच्या बिल्डींगपाशी.....खालून जाताना त्या दिवशी प्राजक्ताचं एकही फूल जमिनीवर दिसू नये हा निव्वळ योगायोग असेल, किंवा काहीही.
घरी जाताक्षणी शुभ्र चादर घेउन, उदबत्तीशेजारी झोपलेल्या तात्यांना मी पाहिलं.
"त्याला काय झालंय?"
"त्ते देवाघरी गेलेत."
"का?"
".............."

जाउ दे, असेल गेला असेल फुलं आणायला.
गेला तो गेला. त्यानंतर फुलांचा सडा पडत राहिला पण मी गोळा करायला गेल्याचं मला आठवत नाही.

आजच्या घडीला ते झाडही नाही अन तात्याही!

Comments

त्यानंतर फुलांचा सडा पडत राहिला पण मी गोळा करायला गेल्याचं मला आठवत नाही.>>>>>

खुप मस्त लेख... नक्किच अशी उणिव भासत असणार
मीनल said…
खूप छान पोस्ट!
keep writing
Saee said…
Hey!
Very beautiful post. =)
Keep writing.
सुंदर. भावनाविवश करणारं लिखाण आहे. भावस्पर्शी लेखनात मृत्यू हा विषय पहिल्या क्रमांकाचाच. पण त्याबरोबरीनेच आपण आपलं भावविश्वही उलगडून दाखवलत, त्यातच लिखाणाचं यश आहे. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.
कोहम said…
very good...keep it up :)
hi sakheetai,

tula kho dilay. lavakar ghe
सखी said…
Thanks people!!

समीक्षक,
तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच जाणून घ्यायला आवडतील.

कोहम,
:)
शमा,
कठीण काम दिलंस बाई!
प्रयत्न करते लिहिण्याचा!
Anonymous said…
Me aaj prathamach ya blog varache lekh vachat ahe. Tumhi Ajobanvar lihilelya athvani bhavuk kartat karan tumcha lekh vachtana nakalat mala mazya ajobanchi athavan ali.
Please keep writing. All the best.
सखी said…
Anonymous,

Thanks for visiting :)

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट