पत्र लिहिण्यास कारण की......
"तुझ्या कानात कूsssss कलू?????" एक वेलचीचा टाका वर घेउन मी वर बघण्याच्या आत, कानाजवळ एक गुदगुली झाली....पण त्या सरप्राईजच्या खटाटोपात बोटातून ती हिरवी गुंडाळी खाली पडली...क्षणार्धात ती उचलून परत फुलपाखरासारखी बोटं गुंफून कानाजवळ........यावेळी मात्र जोरात शीळ या टोकातून त्या टोकाकडे गेली. चिमुकल्या आनंदात गालावर एक लब्बाड हसू उमटलं होतं. "कान दुखला ना माझा...बघू काय आहे ते?" काय असेल?? यू वोन्ट बिलिव्ह अर्चन,.........’पिंपळाचं पान’,...त्याचं बारीक वेटोळं करुन फुंकर घालून शीळ घालण्याचे उद्योग चालले होते. "कुणी शिकवलं हे?? काय काय करत असतेस ठमे तू...." त्यावर ओठांचा नाजूक चंबू झाला... "वासूसू..sssss ने." माझ्या भुवया नकळत वर गेल्या. "आजोबा.....आजोबा म्हणायचं त्यांना, वासू नाही...काय?" बाजूच्याच खांबावर गिरक्या घेण्याचा कार्यक्रम सुरु झाला...लक्ष नाहीये आपलं असं सुचवत. मग मीही माझा हेका सुरु ठेवला. गिरकीसरशी तिचा एक हात बाहेर झेपावला तोच पकडून तिला पुढे आणलं...आणि दोन्ही हात एकात बांधून विचारलं... "काय म्हणायचं मनू....?" बारीकशा प...